Sunday, December 22, 2013

राजकीय सोयीसाठी देशाचा घात!

राजकीय सोयीसाठी देशाचा घात!



अखेर जे अपेक्षित होते तेच घडले. उगाचच काहींना वाटत होते की, दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर कॉंग्रेस वेगळ्या मार्गावर निघाली आहे. राहुल गांधींनी वेगळ्या कॉंग्रेसच्या रचनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सारेच फोल ठरले.
स्वत:ची प्रतीमा स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडणा-या, किमान तसे प्रयत्न करीत असल्याचे भासवणा-या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही अखेर राजकीय सोयीनुसारच वागावे लागले. आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणांचे पद गेल्यामुळे अचानक पृथ्वीराजांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली होती. त्यात त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत त्यांच्या स्वच्छ प्रतीमेचा फायदा झाला होता त्यापेक्षाही गांधी घराण्याशी असलेल्या चव्हाण घराण्याच्या निष्ठा आणि जवळीकीचाही. आता त्याच अशोक चव्हाणांची राजकीय कारकीर्द धोक्यात आणणा-या आदर्श घोटाळ्याच्या चौकशी अहवालाच्या शिफारशी पृथ्वीराजांना फेटाळाव्या लागल्या आहेत. त्यामुळे स्वत:च्याच हाताने स्वत:ला प्रतिस्पर्धी ठरू शकेल अशा एका राजकारण्याला त्यांना राजकीय जीवदान तर द्यावे लागले आहेच पण स्वतःच्या स्वच्छ प्रतीमेवर स्वतःच्याच हाताने शिंतोडे उडवावे लागले आहेत. अर्थात याची चाहुल दोन दिवसांपूर्वी राज्यपालांनी सीबीआयला अशोक चव्हाणांविरूध्द कारवाईची परवानगी दिली नाही तेव्हाच लागली होती.
अखेर राजकारणात, मग तो कोणताही पक्ष असो, स्वच्छ प्रतीमेपेक्षा पक्ष श्रेष्ठींशी निष्ठा आणि त्यातूनच निर्माण होणारी जवळीक हे महत्वाचे भांडवल ठरते. कराडच्या चव्हाण घराण्याप्रमाणेच नांदेडच्या चव्हाण घराण्याकडेही हे महत्वाचे भांडवल कायम राहिले आहे. त्याचबरोबर शरद पवारांशी टक्कर नाही पण किमान त्यांना विरोध करून शक्य तेवढे महाराष्ट्रातच गुंतवून ठेवण्याची गांधी घराण्याची राजकीय गरज भागवू शकेल असे मराठा नेतृत्व हा निकष सुध्दा दोन्ही चव्हाण घराण्यांकडून पूर्ण होतो.



या एका निर्णयामुळे पुढील दुष्परिणाम संभवतात-
१)     राजकारण्यांवर कारवाई नाही वाट्टेल ते करा राजकीय वरदहस्ताचा फायदा घेऊन नामनिराळे राहा
२)    अधिका-यांना सुरक्षा राजकारण्यांना चुका करायचा मार्ग दाखवा, चुका करायला लावा, त्याचा फायदा त्यांना मिळवून द्या, तुम्हीसुध्दा घ्या आणि पुन्हा कारवाई टाळण्याचा मार्ग दाखवून सुरक्षित राहा
३)    पात्र असो वा अपात्र मालमत्ता मिळवा, सरकार वाचवेल असा संदेश गेल्यामुळे म्हाडा आणि अन्य सरकारी संस्थांच्या मालमत्ता मिळवताना खोटी शपथपत्र करण्याला आता अधिक ऊत येईल. कारण त्याला राजमान्यताच मिळाली आहे.
४)    बेनामी मालमत्ताधारकांवर कारवाई न होणे हे सर्वात धोकादायक ठरू शकेल. काहींना हे मत खूप टोकाचे वाटेल. पण आधीच कोणतेही विधिनिषेध न पाळणा-यांना संरक्षण दलांच्या तळांची पाहणी करता येईल अशा जागी राहण्यास मिळणे हेच धोकादायक आहे - ते कुणालाही...जास्त पैसा मिळावा म्हणून आपली जागा भाड्याने देतील! तसेच बेनामी मालमत्ताधारकांना अभय देणे हे देशाच्या सुरक्षेशी केलेली त़डजोड ठरू शकेल. कारण दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा हा बेनामी मालमत्तेच्या माध्यमातूनही होत असतो. अमेरिकेने दहशतवादी कारवायांवर नियंत्रणाचे लक्ष्य बेकायदा अर्थव्यवहार तसेच बेनामी मालमत्तांवर लक्ष केंद्रीत करूनच मिळवले आहे, हे विसरून चालणार नाही.
५)   सर्वात महत्वाचे म्हणजे माजी न्यायाधीश जे. ए. पाटील आणि पी.सुब्रमण्यम यांच्या आयोगाचा अहवाल फेटाळल्यामुळे भविष्यात अशा आयोगांवर प्रामाणिकपणे काम करणारे तयार होतील का, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. एक प्रकारे आपल्याला सोयीस्कर नसणारे चौकशी अहवालच फेटाळण्याचा हा पायंडा निवृत्तीनंतर केवळ उत्पन्न आणि अधिकाराची सोय म्हणून अशा नियुक्त्यांकडे पाहणा-या एका वर्गाला चौकशीच्या मर्यादा काय असल्या पाहिजेत ते दाखवून देणारा आहे.

आता आदर्शच्या चौकशी अहवालाच्या बाबतीत तर परस्परविरोधी निर्णय घेऊन पृथ्वीराजांना विनोदच करावा लागला आहे. जमीन कारगील शहीदांसाठी राखीव नव्हती, राज्य सरकारच्याच मालकीची होती, सरकारने अहवालातील हे निष्कर्ष लगेच स्वीकारले. पण त्याचवेळी अशोक चव्हाणांवर थेट ठपका ठेवत आणखी तीन माजी मुख्यमंत्री तसेच दोन विद्यमान मंत्र्यांवर ताशेरे ओढणारे तसेच १२ सनदी अधिका-यांना घोटाळ्यासाठी जबाबदार धरणारा अहवाल मात्र फेटाळला.
शिवसेना-भाजपाने श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशींची गाय मारली म्हणून आघाडी सरकारला आदर्शचे कोकरू मारण्याचा अधिकार कसा काय मिळू शकतो? एक प्रकारे लोकपालच्या माध्यमातून पंतप्रधानांना चौकशीच्या कक्षेत आणले जात असतानाच दुसरीकडे राजकारणी-अधिकारी-बेनामी मालमत्ताधारक अशांना अभयदान देणे म्हणजे आव कितीही आणला तरी अंतरीचे भाव वेगळेच असल्याचे दाखवून देणारे आहे.
मंत्रिमंडळाच्या या एका निर्णयामुळे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी तर बचावलेच पण २५ अपात्र सभासद तसेच २२ बेनामी मालमत्ताधारकही सध्यातरी सपशेल बचावले आहेत. आदर्श चौकशी अहवाल फेटाळण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय घातक ठरत आहे तो यामुळेच!
आता प्रश्न एवढाच आहे की राहुल गांधींनी लोकपालवर मांडलेली भूमिका आणि आपल्या महाराष्ट्रातील आपले भ्रष्टाचारविरोधी लढवय्ये अण्णा हजारे काय करणार? राहुल गांधींना जर भ्रष्टाचारविरोधी अशी आपली प्रतीमा निर्माण करून कायम राखायची असेल तर आदर्श प्रकरणात स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल. तसेच अण्णांचेही. अनेक राजकारण्यांच्या बाबतीत उपोषणाचे हत्यार उपसून त्यांना घरी पाठवण्याची तसेच सरकारला लोकपालमुळे भ्रष्टाचारविरोधी महत्वाचे पाऊल उचलण्यास भाग पाडण्यासारखी कामगिरी बजावणा-या अण्णांना आता आदर्श प्रकरणीही आदर्श निर्माण करावाच लागेल. उपोषण नको पण किमान आंदोलन तरी!

तुळशीदास भोईटे

9833 7949 61

Tuesday, December 17, 2013

संवेदनशीलता...’लिमिटेड!’

संवेदनशीलता...लिमिटेड!’




बातमी -1 - वर्ष उलटून गेले...तो दिवस विसरायचे म्हटले तरी विसरता न येणारा...दिल्लीत निर्भयावर अमानुष अत्याचार झाले तो  हाच दिवस...वगैरे...वगैरे...

बातमी -2- अवघ्या चार वर्षांच्या बलात्कार पीडित चिमुरडीवर प्रश्नांची सरबत्ती...आणि तेही तक्रार नोंदवताना पोलिसांकडूनच! ...तू खरे बोलते आहेस की खोटे? खरोखरच तू जसे सांगितले तसेच तुझ्यासोबत घडले होते का? ”

बातम्या दोन...आजच्या एका दिवशीच आलेल्या...पहिली बातमी आपण काही उपचार पार पडतो तशी. ठराविक साचाची. वर्ष सरले आता दखल घेतलीच पाहिजे म्हणून आवश्यकच असलेली. दुसरी मात्र हादरवून टाकणारी. एक प्रकारे अत्याचारानंतरचे अत्याचारच उघड करणारी. पुन्हा त्या चिमुरडीसोबत हे सारे अत्याचार झाले ते दिल्लीतच. त्या चिमुरडीवर तिच्याच प्ले ग्रुपच्या मुख्याध्यापिकेच्या पतीने अत्याचार केले ते ही गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच. निर्भयावर अत्याचार झाले त्याच महिन्यात आणि स्वाभाविकच त्या चिमुरडीवर मानसिक अत्याचार करणारे प्रश्न विचारले गेले ते ही निर्भयामुळे आपल्या संवेदना जाग्या झाल्या त्यानंतरच्या काळातच!

त्यामुळेच प्रश्न निर्माण झाला आहे...खरोखरच आपल्या संवेदना जाग्या झाल्या आहेत का?

ठिक आहे. पोलिसांना कायद्यानुसार वागावे लागते. नियमांनुसार काही माहिती विचारावी लागतेच. पण म्हणून असे प्रश्न!

ज्या वयात स्त्री-पुरूष हे भेदही कळत नसतात. त्यावयात कोणीतरी वासनांध सैतान अशा चिमुरड्यांवर अत्याचार करतो. कल्पनेनेही जीव पिळवटून जातो. वेदना कशा सहन करू शकतात ते चिमुरडे जीव...वासनांध सैतानांना तसे करताना कसे काहीच वाटत नाही. एक नाही अनेक प्रश्न मनाला इंगळ्या डसाव्या तसे डसत राहतात. मात्र त्यानंतर ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा, वासनांध सैतानांना ज्यांनी अद्दल घडवलीच पाहिजे असे वाटते, ते पोलीसच असे प्रश्न विचारतात तेव्हा मात्र आपल्याही मनावर अत्याचार झाल्यासारखे वाटतात.

मला फक्त त्या कनिष्ठ पोलिसांना दोष द्यायचा नाही. सर्वात सोपा मार्ग ठरेल तो. नेहमीसारखा. कनिष्ठ स्तरावर काम करणा-या पोलीस कर्मचा-यांमध्ये त्यासाठी संवेदनशीलता असेलच असे म्हणता येत नाही. मात्र वरिष्ठ अधिका-यांचे कायनिर्भयासारख्या प्रकरणानंतरही ते झोपूनच होते काय?  त्या चिमुरडीला विचारले गेलेले प्रश्न पाहिले तर तसेच वाटत आहे.

कारण आताच काही महिन्यांपूर्वी मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला तेव्हाही असाच काहीसा अनुभव आला. मी जेथे कार्यरत होतो त्या चॅनलच्या वार्ताहराला अत्याचार पीडित मुलीची मुलाखत मिळाली. खरेतर ती सर्वच चॅनलना मिळाली होती. मात्र त्या वार्ताहराने फोन करून तिला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीची माहिती त्यात असल्याचे सांगितले. त्यामुळे आमच्या टीमने गंभीरता ओळखून मोहीमेसारखा तो विषय हाताळला. ती मुलाखत स्वत: ऐकली तेव्हा कानात कोणीतरी एसिड ओतत आहे असेच वाटले. तिलाही मुंबईच्या पोलिसांनी असेच प्रश्न विचारले होते. तुझ्यावर बलात्कार कशावरून झाला...तूच तशी आहेस... पोलीसी गणवेशातील एका पुरूषाच्या या हल्ल्यानंतर तिला मग एका वडिलधा-या स्वरात आणखी एकाने समजावले. हे बघ...तुझ्यावर बलात्कार झाला अशी तक्रार नोंदवली तर तुझेच नाव खराब होईल...मग लग्न कसे होईल?”

सुदैवाने कायद्याच्या रक्षकांना जे वाटले ते तिची लग्नाची काळजी ज्याने केली पाहिजे त्या तिच्या भावाला वाटले नाही. त्याचा कणा शाबूत होता. गणवेशाखाली त्याची संवेदना झोपली नव्हती. त्याने सामाजिक कार्यकर्त्यांकडे, प्रसारमाध्यमांकडे धाव घेतली. बहिणीवर अत्याचार करणा-या नराधमांना गजाआड पोहचवले. प्रसारमाध्यमांमध्ये प्रकरण गाजल्यानंतर त्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली.

एवढे झाले तरी मी फक्त कनिष्ठ पातळीवर कार्यरत पोलिसांनाच दोष देणार नाही. चूक आहे ती त्यांच्यात आवश्यक ती संवेदनशीलता निर्माण करण्यात अपयशी ठरणा-या वरिष्ठांची. मोठी-मोठी भाषणे होतात. राजकीय नेते-वरिष्ठ अधिकारी खूप बोलतात. मात्र प्रत्यक्षात ज्या कनिष्ठ पातळीवर प्रत्यक्षात काम चालते. अंमलबजावणीची जबाबदारी असते त्या कनिष्ठ स्तरापर्यंत यातील काहीच पोहचत नसते.

आता काहींना प्रश्न पडेल की कनिष्ठ स्तरावरील पोलीसही माणसेच असतात. त्यांनी संवेदनशील असलेच पाहिजे. होय ना. मात्र जेव्हा तुमच्या हद्दीत गुन्हे वाढलेच नाही पाहिजेत असा वरून दट्ट्या असला तर ठाण्यात बसलेले कर्मचारी गुन्हा घडल्यावरही तो नोंदवून कारवाईसाठी खरीखुरी शाबासकी मिळवण्याऐवजी गुन्हा नोंदवण्याचे टाळून गुन्हेगारी कशी नियंत्रणात ठेवली त्याचे काल्पनिक चित्र उभे करून कौतुक पदरात पाडणारच ना!

तेजपाल प्रकरणाने अगदी न्याय देण्याचा आव आणणारेही कसे अन्याय करणे योग्य मानतात ते उघड झाले आहे. त्या मुलीचा ईमेल हादरवून टाकणारा आहे. तेजपालच्या राजकारण्यांचे वस्त्रहरण करणा-या गौप्यस्फोटांमुळे जेवढा तहलका माजला नव्हता तेवढा त्या मेलमुळे झाला. आपल्या वडिलांच्या वयाच्या वरिष्ठाला आपले शरीर उपभोगू देणे हाच नोकरी टिकवण्याचा मार्ग असे तरूणीला तेजपालांकडून बजावले गेले. हे तेजपाली चाळे सामूहिक बतात्कार करणा-या वासनांध सैतानांपेक्षा फार वेगळे नव्हते. उलट ते नराधम पुढे नैतिकतेचा आव तरी आणत नाहीत. त्या तरूणीने तेजपालाच्या मुलीला तिच्या वडिलांचा पापाचा पाढा वाचताच त्या तेजपालांनी जे म्हटले ते अधिकच संतापजनक...बाप-मुलीच्या नाते-संबंधांचा तरी तू विचार केला पाहिजे होता! ”

तेजपालसारख्यांचे हे वर्तन समाजातील संवेदनशीलता हरपत चालल्याचेच उघड करणारे आहे. मुळात संवेदनशीलता हीच आता दुर्मिळ भासत आहे. पुन्हा ही संवेदनशीलता दुस-यांमध्येच का असावी. तुमचे-आमचे काय? आपण काय करतो. काही अपवाद वगळले तर काय घडताना दिसते. डोळ्यादेखत गैरप्रकार घडताना पाहून कितीवेळा आपण पुढे सरसावतो. प्रतिकार नाही पण किमान नंतर पोलिसांना कळवून त्यांना पुढच्या कायदेशीर कारवाईसाठी तरी आपण मदत करतो का?
केवळ आता मोबाईलवर फेसबुक-टि्वटर उपलब्ध आहे म्हणून पोस्ट-ट्विट करून उपचार पार पाडण्याएवढीच आपली संवेदनशीलता लिमिटेड ठेवायची का?


(आजच्या दैनिक नवाकाळमध्ये हा लेख प्रकाशित झाला आहे)

Monday, December 16, 2013

आता दादागिरी दाखवाच

आता दादागिरी दाखवाच!



बलात्कारी नराधमांचे कापून टाका...आता काय कापायचे ते तुम्हाला ठाऊक आहे... राज्याचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांचे हे वक्तव्य. जालन्यात त्यांनी जाहीररीत्या असे म्हटले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला होता. मात्र दुस-या दिवशी लगेच त्यांच्यावर टीकेची झोड सुरू झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री असे कसे बोलू शकतात...त्यांनी पुन्हा मर्यादा ओलांडली वगैरे...वगैरे...त्यावेळी मी या वक्तव्याच टीव्हीवरील चर्चेत समर्थन केल्यावर अनेकांचे फोन आले. आपण चिथावनीखोर वक्तव्याचे समर्थन कसे करू शकतो, असे मला समजवले गेले. मात्र मला ते पटले नाही. ज्या वयात स्त्री-पुरूष भेदही कळत नसतो त्या वयातल्या अगदी कोवळ्या चिमुरड्या मुलींपासून आजीच्या वयाच्या जख्ख वयोवृध्दांना वासनांध नराधम लक्ष्य करीत असताना कोणालाही चीड येणारच ना. कायदा वगैरे ठीक आहे. पण अगदी घरातल्या स्त्रीयांनाही विचाराल तरी बलात्का-यांचे लिंग कापणे हा त्यांनाही योग्य उपाय असल्याचे त्या मनापासून सांगतील. जनसामान्यांच्या भावना नेत्यांनी अभिव्यक्त केल्या तर त्यात चुकीचे काही आहे असे वाटत नाही. मग ती ठाकरी शैली असो वा अजीत पवारांची दादागिरी.

आता पुन्हा हे सारे आठवण्याचे कारण तसेच आहे. नुकतीच एक घटना घडली आहे.

घटना बारामती येथील आहे. 8 डिसेंबरला 15 वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार झाला. दुस-याच दिवशी त्या मुलीने स्वतःला जाळून घेतले. आज ती पुण्याच्या रूग्णालयात अतिगंभीर अवस्थेत आहे. पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. मात्र आठ दिवस उलटून गेले, तरी पुढे काही घडलेले नाही. ज्याने त्या मुलीवर पाशवी अत्याचार केले तो सुरेंद्र काजळे हा नराधम पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

घटना बारामतीची आहे म्हणूनच नाही तर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची आहे, त्यामुळे आठवले ते दादांचे जालना येथील वक्तव्य. दादांनी काही दिवसांपूर्वीच जालना येथील सभेत जाहीररीत्या बलात्कारी नराधमांविरोधात गर्जना केली होती आणि आता त्यांच्याच बारामतीत ही घटना घडली आहे. दादांनी अभिव्यक्त केलेली सर्वसामान्यांच्या मनातील भावना, कायद्याच्या चौकटीत सध्यातरी बसू शकत नाही. (सध्यातरी...कारण जगात अनेक देशांमध्ये बलात्कारी नराधमांसाठी लिंगविच्छेदनाची शिक्षा आहे! आपल्याकडेही तशी शिक्षा आणणे गैर ठरणार नाही.)

पण किमान आपल्या दादागिरीचा वापर अजीतदादा त्या बलात्कारी नराधमाला जेरबंद करण्यासाठी करणार का? दादा कुणाचीही भीडभाड ठेवत नसतात असे म्हणतात, मात्र सर्वसामान्यांना त्याचा प्रत्यय येणे गरजेचे आहे. नाहीतर एक आक्रस्ताळी, नको तेवढा आक्रमक नेता अशीच त्यांची प्रतीमा तयार केली जात राहील. ही आक्रमकता जर लोकांच्या प्रश्नावर, त्यांना न्याय देण्यासाठी उपयोगात आणली गेली तर खरोखरच अशी दादागिरी पाहिजेच असे कोणीही म्हणेल. मग दादा म्हणतात तसे त्यांच्या द्वेशातून त्यांना कोणी जाणीवपूर्वक लक्ष्य करीत असले तरी तशी टीकाही त्या लोकभावनेच्या झंझावातात पालापाचोळ्यासारखी उडून जाईल. पण दादा तशी दादागिरी दाखवणार का?

#rape #baramati #pawar #ajitpawar #maharashtra #ncp #baramatirapes #rapevictims #castration #punishmentforrape #police #maharashtrapolice