Saturday, October 17, 2020
Maharashtra Farmer's Ground Report from Flood Affected Farms ओला दुष्काळ -शेतकऱ्याचा ग्राऊंड रिपोर्ट
Friday, October 9, 2020
टीव्हीचा धंदा का झाला गंदा? समजून घ्या टीव्ही रेटिंग गेम What is TRP SCAM ? What is TRP game?
३२ हजार कोटी
होय ३२ हजार कोटी
मग कोणी कोणतीही भूमिका घेऊ दे...खरं लक्ष्य असते ते या आकड्यावरच. हा आकडा आहे. भारतीय टीव्ही इंडस्ट्रीच्या वार्षिक जाहिरात उत्पन्नाचा. या आकड्यातील वाटा ठरवण्यात सर्वात महत्वाची कामगिरी बजावतात तेही आकडेच. ते आकडे असतात. टीव्ही रेटिंगचे. म्हणजेच टीव्ही प्रेक्षकसंख्येचे. मग कुणी त्याला टीआरपी म्हणो कुणी बदललेल्या व्यवस्थेतील बार्क रेटिंग म्हणो. पण ते आकडेच जाहिरात उत्पन्नातील वाटा ठरवण्यात सर्वात महत्वाचे ठरत असल्यानं प्रत्येक टीव्ही व्यावसायिकासाठी महत्वाचे असतात. मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्याच्या भानगडीनिमित्त टीव्ही रेटिंग पाच मुद्द्यांमधून समजून घेऊया...
तुळशीदास भोईटेंचा व्हिडीओही पाहू शकता... https://youtu.be/nNIfzvYV-fE
मुद्दा -१
टीव्ही रेटिंग
टीव्ही चॅनलना जाहिराती देण्यासाठी त्यांची लोकप्रियता जाहिरातदारांना माहित असणं आवश्यक असते. जाहिरातदारांच्या त्या व्यावसायिक गरजेतून जगभर टीव्ही रेटिंग सिस्टम अस्तित्वात आली. भारतात पूर्वी टॅम या खाजगी कंपनीच्या माध्यमातून रेटिंगचे काम केले जात असे. त्यावेळीही अनेकदा टॅमच्या टीआरपीविषयी आक्षेप घेण्यात येत असत. एनडीटीव्ही समूहाने तर थेट अमेरिकेत खटला दाखल करून टॅम वेगळ्यापद्धतीनं टीआऱपी रेटिंग ठरवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कॉन्सिल म्हणजेच बार्क ही संस्था अस्तित्वात आली. बार्क ही संस्था भारतातील टीव्ही चॅनल्सची संघटना नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशनसाठी क
सध्या ही संस्थाच भारतात टीव्ही चॅनल्सची प्रेक्षकसंख्या ठरवते.
मुद्दा -२
बार्क कसं काम करते?
बार्क प्रेक्षकांच्या घरातील टीव्ही मीटरवर नोंदवलेली माहिती हंस रिसर्च या वेगळ्या एजेंसीच्या माध्यमातून एकत्र करून तिच्या विश्लेषणानंतर टीव्ही रेटिंग जाहीर करते. त्यामुळेच टीव्ही व्यावसायिकांसाठी गुरुवारचा दिवस एकतर गोल्डन किंवा ब्लॅक थर्सडे असतो. हद्याचे ठोके वाढवणारा असतो.
मुद्दा -३
टीव्ही रेटिंग कसं ठरतं?
बार्कने २०१४मध्ये २२ हजार घरांमध्ये टीव्ही रेटिंग नोंदवण्यासाठी बार ओ मीटर बसवले. प्रथमच छोटी शहरं, ग्रामीण भागाचा भारतीय टीव्ही रेटिंगमध्ये हिस्सा वाढला. त्यावेळी खरंतर ५० हजारांपर्यंत चार वर्षात मीटर लावण्याची घोषणा झाली होती. मात्र, आजही तेवढ्या घरांपर्यंत बार्क पोहचू शकलेली नाही. आताही फारतर ३० हजारांपर्यंतच मीटर असतील, त्यातील २ हजार अडीच कोटीच्या महामुंबईत आहेत.
टीव्ही प्रेक्षकांच्या घरांची निवड आर्थिक, भौगोलिक, शहरी-ग्रामीण असे सर्व गट लक्षात ठेवून केली जाते. प्रेक्षक कुटुंबाला विश्वासात घेऊन बार्कचा बार ओ मीटर घरातील टीव्हीशी जोडला जातो.
त्या मीटरसाठी वेगळा रिमोट असतो. घरातील सदस्यांना टीव्ही पाहताना रिमोटचा वापर करताना लिंग, वय यानुसार ठरवून दिलेली बटणे दाबूनच टीव्ही पाहणे अपेक्षित असते.
या मीटरमधील आकडेवारी बार्कसाठी हंसा रिसर्च एजेंसीकडून गोळा केली जाते. त्या आकडेवारीचं बार्कने ठरवलेल्या अल्गोरिदमनुसार विश्लेषण केले जाते. केवळ किती प्रेक्षकांनी पाहिलं यावर नाही तर किती वेळ पाहिलं हेही टीव्ही रेटिंग ठरवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक आहे. दर आठवड्याला गुरुवारी सकाळी बार्क टीव्ही रेटिंग जाहीर करते.
मुद्दा -४
टीव्ही रेटिंग घोटाळा कसा होतो?
आधी टॅम आणि आता बार्कही दावा करते की आम्ही टीव्ही रेटिंग मीटर कोणत्या घरांमध्ये लावलेत ते गोपनीय असते. कुणालाच कळू दिलं जात नाही. पण टॅमच्या काळातही आणि आताही टीव्ही मीटर असलेल्या घरांपर्यंत काही चॅनलनी किंवा त्यांच्यावतीने संपर्क साधून टीव्ही रेटिंग सोयीनुसार ठरवण्याचे आऱोप झालेत. याआधीही मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अशा घोटाळ्याच्या तक्रारी झाल्या होत्या. रेटिंग ठरवणाऱ्या संस्था किंवा त्यांच्यासाठी सांख्यिकी विश्लेषणाचे काम करणाऱ्या संस्थांशी संबधित असल्याचा दावा करणारे किंवा असणारेही काही आडवळनाने टीव्ही चॅनलच्या संपर्कात येत असतात. रेटिंगसाठी सहकार्य करण्यासाठी कन्सल्टंसी पुरवण्याच्या बहाण्याने अथवा समोरची व्यक्ती लोभी असल्याचं लक्षात आलं तर थेट आर्थिक मागणी करतात. व्यवहार ठरला की मीटर असलेल्या घरातील कुटुंबांना आमिष दाखवून सतत एकच चॅनल सुरु ठेवण्यास सांगितले जाते. श्रीमंत, मध्यमवर्गीय कुटुंबं अशी मीटर लावण्यास तयार नसल्याने अनेकदा असे मीटर आर्थिक कमकुवत घरांमध्येच बसवलेली असतात. त्यातील काहींना वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून हे एजंट आपल्याला पाहिजे ते साध्य करतात. काहीवेळा एमएसओ किंवा वितरकांशी अधिक़ृत संगनमत करून सेट टॉप बॉक्स सुरु केल्यावर टीव्हीवर जी पहिली स्क्रिन दिसते तिला लँडिग पेज म्हणतात. तीच ताब्यात घेणय्याची क्लुप्तीही काही चॅनल्स अर्थबळावर लढवतात. त्याबद्दल तक्रारी आल्याने बार्कने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदल केलेत.
काही वेळा रेटिंगमध्ये बाह्य प्रभाव पडत असल्याचे डेटा व्हॅलिडेशन क्वालिटी इनिशिएटिव्ह सुरु करून दाखवून दिले होते. या मोहिमेचाच एक भाग म्हणून सेटटॉप बॉक्सवाले टीव्ही सुरु करताच जे प्रथम दिसते त्या लँडिंग पेजच्या प्रभावाला कमी करण्यासाठी काही बदल केलेत.
मुद्दा -५
उपाय काय – घोटाळा कसा थांबणार ?
टीव्ही रेटिंग ज्या मोजक्या सॅम्पल साइझवर ठरवले जाते तिथेच घोटाळ्याचे मूळ आहे. शेकडो कोटींचा देश, टीव्हीचे रेटिंग ठरवतात ती घरे मात्र काही हजारच! त्यामुळे ३२ हजार कोटींच्या जाहिरात उत्पन्नात मोठा वाटा मिळवण्यासाठी खर्च करणे चॅनलना सोपे जाते. त्यातील काही गैरमार्ग निवडतात. ते रोखायचे असेल तर ठराविक प्रेक्षकांवर अवलंबून बेभरवशाची रेटिंग पद्धत बंद केली जावी. भारतात आता अनालॉग सेटटॉप बॉक्सेस नसतीलच. सरकारनेच ते सक्तीने थांबवलेत. सेटटॉप बॉक्स डिजिटल असल्याने आतील चीपमध्ये काही बदल करून एमएसओ म्हणजे वितरकांच्या कंट्रोल रुममध्ये बार्कने सुरक्षित यंत्रणा उभारली तर केवळ काही घरांचं नाही तर बहुसंख्या टीव्ही प्रेक्षकांच्या घरांमधील खरी निवड कळू शकेल. तसंही लिंग आणि वयोगटाप्रमाणे प्रेक्षक रिमोटचे बटन दाबून बदल नोंदवत असतील ही शक्यता कमीच आहे. अर्थात सर्वच घरे टीव्ही रेटिंग ठरवू लागले की चॅनलना त्यांच्यावर प्रभाव पाडता येण्याची भीती आहेच. पण सध्या मर्यादित संख्येत मुळात वास्तवदर्शी आहेत की नाही तेच कळत नसलेल्या रेटिंगबाबतीत जर घोटाळे होतात, त्या तुलनेत तो धोका तेवढा मोठा नसेल.
हा घोटाळा थांबवायचा असेल तर ती शक्ती तुमच्या आमच्यासारख्या प्रेक्षकांच्या हातातील रिमोटमध्ये आहे. टीव्ही सेटटॉप बॉक्सचा रिमोट वापरताना योग्यच चॅनल निवडा. तुमच्या घरी जर टीव्ही रेटिंग मीटर म्हणजे बार्कचे बार ओ मीटर असेल तर कृपया विकले जाऊ नका. मीडिया माफियांना साथ देऊ नका. तुमच्या डोक्यानं रेटिंग मीटरचा रिमोट वापरा. तुम्हीच टीआरपी घोटाळा थांबवू शकता. अन्य कुणीच तसं करणार नाही.
- तुळशीदास भोईटे
संपादक
www.muktpeeth.com
९८३३७९४९६१
पाहा व्हिडीओ आणि यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा
वाचा फेसबूक पेजवर आणि पेज लाइक करा मुक्तपीठ Muktpeeth फेसबूक पेज
https://www.facebook.com/109767937512717/posts/134673098355534/
ट्विटर मुक्तपीठ ट्वीटर, मुक्तपीठ इंस्टाग्रामवर फॉलो करा
लवकरच अधिकृत सुरुवात www.muktpeeth.comमुक्तपीठ
Monday, September 28, 2020
जनहित याचिका म्हणजेच पीआयएल म्हणज नेमके काय ?
Friday, September 25, 2020
दीपिका - रणवीर आणि एनसीबीच्या कव्हरेजमध्ये तुम्ही महाराष्ट्रात आणखी काय घडलं ते विसरला तर नाही ?
Sunday, September 13, 2020
लॉकडाऊनमध्ये 'तो' अनाथांसाठी केस कापायला शिकला !
आजच एक पोस्ट वाचली.
" मी केशकर्तनकार नसूनही मी हे काम लॉकडाऊनमध्ये शिकून घेतलं आहे. गेल्या २वर्षात आपण २७००,२८०० लोकांना ही सेवा दिली आहे. हे एकट्याचं काम नसून तुमचा सहकार्याची गरज आहे. मी सर्व काम शिकवेन. जो कोणी इच्छूक असेल त्यांनी माझाशी संपर्क करा. 🙏आणि ग्रुप मधील जे कोणी डॉक्टर असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की जर कोणत्या व्यक्तीचा डोक्यामध्ये जखमा किंवा खवले होत असेल तर मला प्रथम उपचार कसे करता येईल याचे मार्गदर्शन करावे."
अनाथाश्रम, वृद्धाश्रम वगैरे आश्रमांमध्ये जाऊन समाजसेवा करणारे अनेक आहेत. नाभिक समाजातील नसूनही केशकर्तनकला शिकणारेही हजारो असतील. आता करिअरचा एक चांगला पर्याय झाला आहे. पण या पोस्टमधून मला दिसलं एक वेगळंपण. समाजसेवेसाठी सहकार्याचा वेगळा मार्ग शोधण्याची धडपड. मी निकेशशी बोललो
निकेत सखाराम व्यवहारे. २७ वर्षांचा तरुण. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बोर्डात नोकरी करतो. तिथं आठ तास नोकरी करुन उरलेल्या वेळेत समाजासाठी धडपड. वडिलांना समाजसेवेची आवड आहे. सखाराम बापू व्यवहारे त्यांचं नाव. किराणा मालाचे दुकान आहे. त्यातून वेळ काढून ते समाजसेवा करत असतात. निकेत ते लहानपणापासून पाहत आला. तेव्हापासून तो अनाथ, दिव्यांग, दृष्टीहिनांच्या निवारा केंद्रात जात असे.
त्याचा मूळ राजस्थानमधील मित्र सुनील सैनी यांचं उल्हासनगरात सलून आहे. आदल्या दिवशी निकेत म्हसकळच्या पारस बालाश्रमात गेला होता. तिथं मुलांचे केस वाढलेले होते. चौकशी केली तर कळलं की त्यांना गाडी मागवून केस कापण्यासाठी जावं लागतं. गाडी आली की ते जाणार आहेत. निकेतने सलूनमध्ये केस कापायला आलेले मुलं पाहिले. त्यांना पाहून तो सुनीलला म्हणालो आपण आश्रमात जाऊन केस कापले पाहिजेत. सुनील लगेच तयार झाला. गेले दीड वर्षे निकेत सुनील सैनी आणि आणखी एका सलूनवाल्याला घेऊन अनाथाश्रम, अंध आश्रम, बेघर निवारा केंद्र, वृद्धाश्रम अशा ठिकाणी सेवा देतात. त्यातही टिटवाळामधीस म्हसकळचा पारस बालाश्रम, उल्हासनगर मनपाचे बेघर निवारा केंद्रांमध्ये ते दर ४५ दिवसांनी जातात. कर्जतच्या सावित्रीफुले निवारा केंद्रातही ते सेवा करतात.
लॉकडाऊनमध्ये सुनील सैनी राजस्थानला परतला. अडचण झाली. आता आश्रमांमधील प्रवेश सुरु होईल. मुलांचे, वृद्धांचे, बेघरांचे केस कापायचे कसे ? निकेतला प्रश्न पडला. त्यानेच मार्गही शोधला. ओळखीच्या सलूनवाल्या मित्रांकडून त्याने केस कापण्याचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. आता परवानगी मिळताच तो स्वत: केस कापणार आहे.
त्याला विचारलं, हे काम का शिकलास? निकेत म्हणाला, मला समाजसेवेची नशा आहे. ४५ दिवस झाले की मला वाटते आश्रमातील मुलांचे, लोकांचे केस वाढले असतील. मी तिथं जातोच जातो. आता लॉकडाऊनमुळे शक्य झालं नाही. आता सुनील नसेल तर काम अडू नये म्हणून स्वत: शिकलो. अनेक मुलांच्या डोक्यात खवले असतात. वृद्धांच्या डोक्यात रिकामपणात खाजवून झालेल्या जखमा असतात, त्यांच्यावर उपचार कसे करावं ते कळत नाही. हायड्रोजन लावतो. पण इतर उपचार कळावेत, म्हणून डॉक्टरांना आवाहन करणारी पोस्ट केली."
निकेतच्या कामाला समाजातूनही सहकार्य लाभतं. त्याचा सलूनवाला मित्र सुनील सैनी, सहकारी जसे सरसावले तसेच इतरही आहेत. उल्हासनगर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत यांनी केस कापण्याचे किट घेऊन दिलं.
मधल्या काळात निकेत एनडीआरएफच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाला. पूर परिस्थिती, भूकंप, चक्रीवादळातील मदतकार्याचं प्रशिक्षण घेतलं. नेहरू युवा केंद्राच्या सहकार्यानं एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं.
समाजसेवा हजारो करतात. पण निकेश समाजसेवेची आणखी एक संधी शोधून काढतो. परत ते काम बंद पडू नये म्हणून स्वत:च शिकून घेतो. पुन्हा त्यात आरोग्य समस्या आढल्यानं त्यावरील उपायांसाठीही प्रयत्न करतो. सर्वच मला वेगळं वाटलं.
डॉक्टरांना निकेतला मार्गदर्शन करायचे असेल, औषधं सुचवायची असेल, कुणाला औषधं द्यायची असतील तर त्याच्या आवाहनला नक्की प्रतिसाद द्या.
- तुळशीदास भोईटे
९८३३७९४९६१



