ते फक्त जीवाची मुंबई करतात
उदात्ततेचा आव आणत मुंबई शोषतात
तुमची माझी आमची मुंबई
अशांना कळणार तरी कशी?
झगमगाटात दिपतातच डोळे आणि डोके
माणसं नाहीच हे पार्टी अॅनिमल पेज थ्रीवाले
मुंबईत जगतात, मुंबईत मिरवतात,
तरी मुंबईवरच दुगाण्या झाडतात?
मेंदूनं नाही मनानं विचार करा,
कधी तरी म्हणा मुंबई आपली !
कधी तरी माणसांसोबतही राहायचं,
जगायची माझी मुंबई
अनुभवाल मुंबईची माणुसकी,
जिवंतच नाही तर सळसळती
चलाच कधीतरी उघड्या डोळ्यानं,
खुल्या मनानं मुंबईला जगा
मेंदूनं नाही मनानं विचार करा,
कधी तरी म्हणा मुंबई आपली !
जीवाला जीव देते माणुसकीनं,
एकटं पडू देत नाही ती मुंबई
लोकलच्या गर्दीतही अडलेल्यांना
माणुसकीनं जपते ती मुंबई
बदाबदा पावसात पाण्यात
बुडू देत नाही माणुसकी ती मुंबई
संकटातही माणुसकीनं
उपाशी राहू देत नाही ती मुंबई
लॉकडाऊन झालं तरी
माणुसकी लॉक नसते ती मुंबई
मेंदूनं नाही मनानं विचार करा,
कधी तरी म्हणा मुंबई आपली !
मलबारहिल, नरिमन पॉइंट, जुहू,
फक्त फाइव्ह स्टारच नाही मुंबई
गिरणगावात कष्टाच्या घामाच्या सुगंधात
दणक्यात संस्कृती जपते मुंबई
धारावी म्हटलं तर नाक वेंगाडता,
तिथंही जगण्याचा उद्योग देते मुंबई
शेअरबाजाराचे सौदे, कॉर्पोरेट उलाढाल
देशाचं अर्थचक्र चालवते मुंबई
धकाधकीचं जीवन, अचाट अफाट वेग
सोबत माणूसपण जपते मुंबई
रस्त्यावरच्या बेघरांना पांघरते माया,
देशातल्या रुग्णांचा आधार मुंबई
मरिन ड्राइव्ह, बँड स्टँड
गर्दीतही प्रेमिकांना एकांत देते मुंबई
मेंदूनं नाही मनानं विचार करा
कधी तरी म्हणा मुंबई आपली !
एखाद्याचं स्वप्न अकालीच शांत होतं,
तेही मनाला लावून घेते मुंबई
विसरू नका आधी स्वप्नं सारी बहरवते,
ती हीच स्वप्ननगरी मुंबई
जबाबदार असतील ते इतर कुणीही,
चकचकाटातील स्वप्नांचे सौदागर
पेज थ्रीच्या परग्रहावरचे ते,
माय मुंबईतील भलतेच एलियन
उगाच दुषणं का मुंबईला,
लखलखाटात दिसत नसतंच वास्तव
मेंदूनं नाही मनानं विचार करा,
कधी तरी म्हणा मुंबई आपली !
विचारा संकटातून सावरलेल्यांना,
कशी आहे आपली मुंबई?
आठवा कधी म्हटलं मुंबईनं परकं,
आपुलकीचा ओलावा कधी आटला?
फुप्फुसावर नाही ह्रदयावरच घातला घाव,
तरी झिडकारलं का मुंबईनं?
मेंदूनं नाही मनानं विचार करा,
कधी तरी म्हणा मुंबई आपली !
माणूस म्हणून विचार करा माणसांसारखा
ह्रदयातूनच उचंबळेल...ही मुंबई आपलीच !
- तुळशीदास भोईटे
९८३३७०४९६१
खुप सुंदर वर्णन . कर्मभूमि बद्द्ल प्रत्येकाल विचार करायला लावणार लिखान .👏👏
ReplyDeleteखुप छान विचार पटणारे आहेत... मुंबईच्या नावावर राजकारण करणं हाच त्यांचा पिंड...
ReplyDeleteखूप छान पोस्ट
ReplyDeleteखूपच छान सर..
ReplyDelete