Monday, August 17, 2020

सुनील इरावारांचा गळफास...राज ठाकरेंना अस्वस्थ करणारा...पण प्रत्येकानं विचार करावा असा !

सुनील इरावार. नांदेडचे मनसे पदाधिकारी. त्यांनी रविवारी गळफास. स्वत:ला संपवलं. सुनील किनवटमधील. किनवट तसं नांदेडच्या कोपऱ्यातील. महाराष्ट्राच्या तर आणखीच कोपऱ्यात. जास्त चर्चा झाली नाही. पण त्यांचं पत्र वाचलं आणि त्यातील एक वाक्य मनाला स्पर्शून गेलं. दाहक वास्तव मांडणारं असं ते वाक्य. 

आत्महत्येच सुनीलनं सांगितलेलं कारण. त्यांनी आपल्या अखेरच्या पत्रात आई-वडिलांची माफी मागतानाच आपल्या अध्यक्षांसाठीही लिहिलं..."राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात यावर राजकारण केल जातं.आणि या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत. अखेरचा जय महाराष्ट्र. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मी माझं आयुष्य स्वखुशीने संपवत आहे. जय महाराष्ट्र. जय मनसे. जय राजसाहेब"
सुनील इरावारांनी स्वत:चं जीवन ऐन तारूण्यात संपण्यासाठी दिलेलं कारण वेगळंच. आजवर तसं उघडपणे कुणी न मांडलेलं. पण आहे ते महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील वास्तव. त्यामुळेच या प्रकरणाची जास्त माहिती घेण्यासाठी प्रयत्न केले. किनवटलाच शुभम शिंदे हा तरुण पत्रकार राहतो. त्याच्याशी बोललो. त्याच्याकडून सुनीलच्या अमोल जाधव या मित्राचा मोबाइल नंबर मिळाला. अमोलला कॉल लावताच तो भडाभडा बोलू लागला. आणि एक सामान्य कार्यकर्ता निष्ठेच्या बळावर मनानं किती मोठा असतो ते अनुभवता आलं.
अमोल म्हणाला, "सुनील इरावार आमचा मित्र. मी काही मनसेचा कार्यकर्ता नाही. पण आमचा सुनील गेली दहा वर्षे तरी राजसाहेबांचा फॅन. त्यामुळे तो मनसेचं काम करु लागला. आम्हीही त्याला साथ देऊ लागला. राजकारणात असला तरी सुनील खूपच गरीब घरातील. त्याचे वडिल मेल एक्स्प्रेसमध्ये काही कामे करून कमाई करायचे. लॉकडाऊनने ती कामेही थांबली. त्याची आई किनवटच्याच एका वसतीगृहात भांडी घासायचे काम करते. कष्ट करणारे कुटुंब.
 सुनीलही तसाच. मात्र, तो आपलं कुटुंब, स्वत: यापेक्षा समाजाचाच जास्त विचार करायचा. त्याने कधीच पैशाच विचार केला नाही. राजसाहेबांचा कडवट चाहता. वाट्टेल ते करण्यास तयार असणारा. केवळ त्यांना भेटायचं म्हणून दोन वेळा मुंबईला गेला. एकदा मनसेचं निवडणूक चिन्ह असणारा इंजिन भेट दिलं. तेही असं तसं नाही. किनवटला सागाची झाडे खूप. साहेबांनी द्यायचं म्हणून त्यानं सागाचं बनवून घेतलं. ते दिलं. गर्दीमुळे थेट साहेबांच्या हाती देता आलं नाही. त्याची रुखरुख राहिली. पण टीव्हीवर साहेब दिसलं की दिसणारं इंजिन आपणच दिलेलं असं तो अभिमानानं सांगायचा."
अमोल सांगत होता. मला स्वत:ला असे कार्यकर्ते खूप भारी वाटतात. मोठे वाटतात. नेत्यांपेक्षाही. त्यामुळेच खरंतर सुनीलविषयी माहिती मिळवत होतो. अमोल सांगू लागला, "सुनील खूप काम करायचा. त्याला इतर पक्षांमध्येही बोलवायचे. पण तो निक्षून सांगायचा, जे काही आहे ते राजसाहेबांसाठीच करेन. सुनील मनसेचा किनवट शहर अध्य़क्ष होता. पण खूप प्रामाणिक. पक्षाशी आणि लोकांशीही. खूप कामं करायचा. अडीनडीला धावायचा. खिशात काही नसताना काम करत राहायचा."
अमोलने पुढे सुनीलच्या नैराश्याचं कारण मांडलं, "किनवटमध्ये दोन समाजांची लोकसंख्या जास्त. एसटी आणि बंजारा. मतांच्या राजकारणात सुनिल होता ती मसनजोगी जात तशी काहीच महत्व नसलेली. त्यामुळे सुनीलची निराशा वाढत गेली. त्यातच आर्थिक स्थितीनं तो अधिकच ढासळला." 
अमोलनं सांगितलेलं आत्महत्येचं कारण सुनीलनं त्यालाही सांगतिलं नसावं. सुनीलने ते आत्महत्येच्या पत्रात लिहिल्यानं उघड झालं. आर्थिक तंगी ठाऊक होती. पण ती आताची नाही. कदाचित लॉकडाऊननं सर्वच आटवलं असावं. त्यात मग जातीय समीकरणांच्या राजकारणात आपला निभावच लागणार नाही, ही भावना अधिकच तीव्र झाली असावी. त्यातूनच रविवारी पहाटे त्यानं गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. 
खरंतर जातीय समीकरण हे विदारक वास्तव. मात्र, तसं असल्यानं काहीच करता येत  नाही असं नाही. अनेक राखीव मतदारसंघांमध्ये ज्यांच्यासाठी जागा राखीव असते ते समाज सोडून इतर समाजाचे कार्यकर्ते नेते काम करत राहतात. किमान पदांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तसंच ओपन मतदारसंघांमध्ये इतर कमी संख्या असणाऱ्या जातींच्या बाबतीत घडतं. त्यांना इतर काही जागा राखीव असल्यानं त्यांनी ओपनकडे पाहूच नये असाही एक दृष्टिकोन आढळतो. पण तिथंही ते कार्यकर्ते-नेते थांबत नाहीत. काम करत राहतात. 

काही ठिकाणी तर समाज नसला तरी कामाच्या, पक्षाच्या बळावर चंद्रकांत खैरेंसारखे नेते अनेक वर्ष निवडून येत राहतात. त्यांच्या बुरुड समाजाची घरं मोजलीत तर काही टक्केही नसतील. तसंच इतरही काही लोकप्रतिनिधी असतात. अर्थात ते अपवादच. पण सुनिलला हे समजवणारं कुणी नसावं. तो आपल्या नेत्यांशी बोललाही नसावा. त्यात आर्थिक तंगीची झळ मनातील नैराश्य अधिकच दाट करणारी ठरली असावी. त्यातूनच त्याने स्वत:ला संपवलं. पण सुनील ईरावारांना हे कुणी समजवलंच नसावं.
हे लिहून संपवतानाच राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली. "अरे बाबांनो जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण बदलण्यासाठी पक्ष स्थापन केला. जात आणि पैसा या गोष्टीवर मला माझ्या पक्षाचं राजकारण करायचे नाही. त्यासाठी मी माझे तत्व सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल,” असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष असे आहेत जे जातीय आधारावर राजकारण करताना दिसत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनाला किती लागलं असावं ते समजू शकतो. पण एक मात्र नक्की. थेट पक्षाचे सर्वोच्च नेते नाही. पण किमान इतर जिल्हा-संपर्क नेत्यांनी तरी आपल्या पक्षाच्या अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवला पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. राजकारण म्हटलं की अर्थकारणच असं नसतं. मी शेकडो तरी अशा कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांना ओळखतो जे घरचं खावून लष्कराच्या भाकऱ्या भाजतात. काही तर कर्जबाजारी होतात. बर्बाद होतात. आणि असे मनसेतच नाही प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. नेत्यांनी या कार्यकर्त्यांना सभोवतालच्या गर्दीतून वेळ काढत समजून घेण्याची एक व्यवस्था उभारली पाहिजे. पुढच्या फळीतील नेत्यांची अशी व्यवस्था. समर्पित कार्यकर्त्यांना वेळ देणारी. या व्यवस्थेनं अशांना आधार दिला पाहिजे. शक्य तसा पैशाचाही, किमान मानसिक तरी. समजवलं पाहिजे, संपत नसतं काहीच. नेहमीच असते संधी. प्रतिकुलतेतही.  
सुनीलचा भाऊ अनिलशी राज ठाकरे बोलले. तो संवाद ऐकला, राज ठाकरेंनी विचारलं, "अनिल, राज ठाकरे बोलतो, काय झालं? असं का केलं?" अनिल म्हणाला, "वाघ गेला साहेब तुमचा वाघ गेला. अचानक काय टेन्शन होतं. गेला साहेब. खूप जीव लावत होता हो साहेब. तुमच्याबद्दल कुणी काही पोस्ट केली तर खूप भांडत होता. सांगायचा खूप भाग्यवान मी, साहेबांना अशी तशी माणसं भेटत नाही. मी भेटलो
अशा वेळी नेत्यांचं दु:खही वेगळंच. राज ठाकरेंच्याच शब्दात सांगायचं तर...“मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्य़ावर येऊ नये." अशी वेळ त्यांच्यावरच काय कुणावरही येवू नये. आणखी कोणत्याही सुनीलमधील महाराष्ट्राचं भविष्य असं अकाली करपू नये. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते नेत्यांनाच. तसं घडलं तर बिघडणं नक्कीच थांबेल.

- तुळशीदास भोईटे
मोबाइल - 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite

Tuesday, August 11, 2020

"मौत तूने मुझको जमींदार कर दिया"


राहत इंदोरी...शायरीच्या दुनियेतील सदाबहार सदाबंडखोर कलाकार. शायरीतील हळूवारपणा जपतानाच अंगार उसळवणारे शब्द म्हणजे राहत इंदोरी. 

आपल्या भावनांना शब्दरुप देत त्यांना आपल्या शैलीत मांडणाऱ्या राहतजींचं जाणं मनाला चटका लावणारं...

त्यांनी मृत्यूलाही कलात्मक धन्यवादच दिले होते....

"दो गज सही मगर ये मेरी मिल्कियत तो है,
ऐ मौत तूने मुझको जमींदार कर दिया"

कसलीही पर्वा न करता सत्तेच्या...प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आवाज बुलंद करणारे राहतजी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यातील सत्तेच्या धुंदीला सहजच ठणकावून गेले...

"जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं, ज़ाती मकान थोड़ी है"

हा माणूस एवढी हिंमत कशी दाखवू शकतो असा प्रश्न ज्यांना पडायचा अशा कणाहीनांनाही त्यांनी विचारलेलं...

"लोग हर मोड़ पे रुक रुक के सँभलते क्यूं हैं
इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यूं हैं"

भेदाभेदाचं राजकारण करुन देशाची एकात्मता धोक्यात आणणाऱ्यांना राहजींनी बजावलेलं...

"सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है"

त्यांच्याकडे भौतिक संपत्ती, सत्तेचा आधार असं फार काही होतं...असं नाही...पण आपल्या हिंमतीबद्दल त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता...

"मैं जानता हूं दुश्मन भी कम नहीं,
लेकिन हमारी तरह हथेली पर जान थोड़ी है"

हिंमत हरायची नाहीच...उलट संकटालाही ठणकावून सांगायचं. राहतजींनी वारंवार ते मांडलं...

"शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम
आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे"

एक शायर. लोकप्रिय. सृजनशीलतेचं शिखरं गाठणारा. लोकांना भावणारा. आणखीही काही तसे असतील. पण राहत इंदोरीच तशी हिंमत दाखवायचे...त्यांच्या हिंमतीचं कारण त्यांच्याच शब्दात...

"बादशाहों से भी फेंके हुए सिक्के न लिए
हम ने ख़ैरात भी माँगी है तो ख़ुद्दारी से"

आज ते गेले...जीवनभर ज्या प्रवृत्तींचा शब्दांची शस्त्रं करून मुकाबला केला त्यांची थोबाडं फोडणारे त्यांचे हे शब्द. का शायराची अंतिम इच्छाच...

"मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना
लहू से मेरी पेशानी पर हिंदुस्तान लिख देना"

- तुळशीदास भोईटे
9833794961
@TulsidasBhoite

Thursday, August 6, 2020

मुरलीधर शिंगोटे : शून्यातून शिखर...जबरदस्त न्यूजसेंस !


मुरलीधर शिंगोटेंच्या प्रेरणादायी जीवनकथेत एक भाग खूपच नाट्यमय. अमिताभ शून्यातून पुन्हा शिखरावर झेपावले तसाच. त्यांच्याकडे मुंबईतील तेव्हा प्रचंड खपणाऱ्या नवाकाळची एजेंसी होती. कालनिर्णय प्रकाशनाच्या साळगावकरांनी अचानक दैनिक प्रकाशनाचा निर्णय घेतला. दैनिक वर्तमान नाव नक्की झालं. मराठीतील बहुधा पहिलं बहुरंगी दैनिक. वितरक म्हणून चांगला खप असलेल्या नवाकाळच्या शिंगोटेंनाच गळ घालण्यात आली. त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी वर्तमानचं वितरण स्वीकारलंही. बहुधा नवाकाळला ते मान्य नव्हतं. त्यांनी शिंगोटेंना दूर केलं. कालनिर्णयचं दैनिकही अत्यल्पजीवी ठरलं. मुरलीधर शिंगोटेंकडे काहीच उरलं नाही. पण ते शांत बसले नाहीत. त्यांना स्वत:च्या वितरण साखळीत काम करणाऱ्यांचीही काळजी होती.  त्यांनी स्वत:चंच दैनिक सुरु करण्याचा निर्धार केला. मुंबई चौफेर या सायंदैनिकाच्या रुपानं प्रत्यक्षात आणला. त्यानंतर त्यांनी पुढेच झेपावणं सुरु केलं. वार्ताहर, हिंदीतील लोकप्रिय असं यशोभूमी आणि अन्य अनेक भाषांमधील दैनिकं त्यांनी प्रकाशित केली. 

अभिमान म्हणजे मराठी दैनिक, चॅनलचे मालक अमराठी असताना मुरलीधर शिंगोटे हा अस्सल मराठी माणूस हिंदी, तमिळ, कन्नड दैनिकांचाही मालक होता! मध्यंतरी इंग्रजी दैनिकाचा प्रयोग मोठा फटका देणारा ठरला. तरीही त्यांनी नव्या पिढीसह दै. पुण्यनगरी महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पोहचवला. 

अनेकांना ठाऊक नसेल त्यांचा न्यूजसेंस. मी ऐकलेला. अंक छापायला जाईपर्यंत ते लक्ष ठेवत. कोणती बातमी वाचकांना भावेल ते लक्षात घेऊनच पहिलं पान. नवी बातमी आली तर छपाई थांबवून ती घेण्याचा कटाक्ष. 

एक वृत्तपत्र वितरक ते अनेक भाषांमधील दैनिकांचे मालक. अभिमान वाटावा असाच खराखुरा शुन्यातून शिखरापर्यंतचा आपल्या माणसाचा प्रवास ! 

- तुळशीदास भोईटे