Thursday, August 27, 2015

खाऊन माजा, टाकून नको!

अरे खाऊन माजा, टाकून माजू नका”,  लहानपणी आईचा हा टोला ठरलेला असायचा. भावंडापैकी कुणीही काहीही ताटात सोडलं तर ती हमखास बजावायची. तेव्हा जास्त काही कळायचं नाही. एवढंच समजायचं वाढलेल्या अन्नापैकी काही सोडलेलं आईला आवडत नाही. नंतर कळलं आई तसं का बोलते. आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आईच्या त्या बोलण्याचं महत्व चांगलंच पटतंय.



कॅबिनमधील टीव्हीच्या पडद्यावर बातम्या सुरू असतात. मंगळवारी बीडच्या एका शेतकऱ्यांची बातमी बीग टेक्स्टमध्ये चालू झाली आणि हातातला घास तसाच राहिला. मनच होईना, पुढचा सोडा पण तोही घास तोंडाकडे नेण्याचं. त्यात पुन्हा आईचे संस्कार करणारे टोले आठवले. अरे खाऊन माजा, टाकून माजू नका. हे सारं थैमान मनात सुरू होण्यास कारण ठरलेली ती बातमीही तशीच होती.


दुष्काळी परिस्थितीला वैतागून शेतक-याची आत्महत्या
शिरुर कासार तालुक्यातील खोल्याचीवाडी येथील घटना
दादासाहेब खोले या शेतक-याने केली आत्महत्या
जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसा नसल्याने केली आत्महत्या

      बीडचे पत्रकार अविशांत कुमकर यांनी अगदी पोटतिडकीनं विषय मांडला. बातमी डोळ्यासमोरून गेली. पण अगदी डोक्यातच घुसली. मनाला लागली. दुसऱ्याच दिवशी बीडच्याच आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मग मात्र राहवलं नाही. अविशांतला फोन केला. अविशांत उत्साही तरूण पत्रकार. बीडच्या गावागावात, वस्त्यांवर फिरणारा. नेमक्या परिस्थितीची माहिती ठेवणारा.
बीड तसा कमी पावसाचाच जिल्हा. मात्र गेली दोन वर्ष पावसानं जरा जास्तच पाठ फिरवली. अगदी ढुंकूनही पाहिलं नाही अशीही तिथं गावच्या गावं आहेत. पाटोदा, आष्टी, शिरूर कासार, गेवराई, टाकळशी, शेकापूर, बीड, सांगवी...तालुक्यांमागून तालुके कोरडेठाण पडलेत.
तसे दीडशे टॅंकर फिरतात. मात्र तरीही पाणी टंचाई कायमच. कमी होणार कशी. हंडाभर पाण्याची तहाण चमच्याभर पाण्यानं कशी भागणार? त्यात पुन्हा पाणी आणायलाच जलस्त्रोत उरले नाहीत तर पाणी आणणार तरी कुठून? जेथे पाणी आहे तेथून ते भरायला टॅंकर न्यावा तर वीजच नाही. वीजपुरवठा नसल्यानं टॅंकर भरता येत नाही. त्यामुळे पाणी पुरवता येत नाही. ग्रामीण भागाच्या पाचवीलाच पुजलेला वीजेचा दुष्काळ आताच्या दुष्काळाची दाहकता अधिकच वाढवतोय.
बीडच्या ज्या बातमीमुळे डोक्यात हे सारं चक्र सुरू झालं ती अशीच. दुष्काळी परिस्थितीला वैतागून दादासाहेब खोले यांनी जीवन संपवले. काय कारण होतं? दुष्काळ आहेच. पण शेतकरी लढत असतो. रडत नसतो. तरीही दादासाहेबांनी स्वत:ला संपवलं कारण त्यांच्या पोटच्या लेकरांसारखं असणाऱ्या जनावरांना द्यायला त्यांच्याकडे चाराच नव्हता. चारा असणार तरी कसा? गेली दोन वर्ष पाऊस दगा देत आहे. पडतच नाही. पडला तरी अवकाळी पडतो. त्यामुळे चारा आणायचा कुठून? ऊसाच्या पातींचा द्यायचा म्हटलं तरी तो आता आहेच नाही. कुठून मिळवला तरी त्याच्या धारेनं जनावरांची तोंड कापली जातात. पुन्हा जनावरं काही केल्या तोंड लावत नाहीत. त्यामुळे दादासाहेबांच्या जनावरांनाही काही देता येत नव्हतं. त्या हतबलतेतूनच त्यांनी जीवन संपवलं असावं.
 पोटच्या लेकरासारखं सांभाळलेल्या जनावरांना मातीमोल भावानं विकावे लागत आहेत. बीडमध्ये किमान सहा ते सात लाख लिटर दूध संकलन घटलं असावं. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ लागलंय. मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सूरू झालंय. कदाचित गेल्या काही दशकांमधलं सर्वात मोठं स्थलांतर सुरू झालंय.
तेवढ्यात समोरचा फोन वाजला. मुंबईत पाणीटंचाई जाहीर होऊ शकते. गेल्यावर्षापेक्षा यावेळी खूप कमी पाऊस झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये चार दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. त्यामुळे स्वाभाविकच मुंबईत पाणी कपात केल्याशिवाय पर्याय नव्हता. तेवढ्यात पुण्याची बातमी आली. पुण्यात तरणतलाव, गाडी धुणे, बांधकाम यासाठी पाणीवापरावर बंदी आली. आता शक्यता आहे, काहींचा नाराजीचा सूर उमटेल. कमी पाण्यात कसं भागवायचं? पोहणं बंद करायचं? गाड्या नाही धुवायच्या? लॉन वाळू द्यायचा? एवढं पाणी आहे ना तलावांमध्ये. उगाच कशाला पाणीकपात करता. पाण्याच्या वापरावर बंदी लादता.
ज्यांच्या डोक्यात असे विचार येतील त्यांनी फक्त एवढंच लक्षात घ्यावं की आपण शॉवर घेतो तेव्हा त्यात एका बादलीत होणारी आंघोळ ही चार-सहा बादल्यांवर सहज जाते. म्हणजे एका माणसानं शॉवर नाही घेतला, तर गावच्या एका कुटुंबाची पाण्याची गरज भागू शकते. तसंच एका तरणतलावानं एका छोट्या दुष्काळी गावचा पाणी प्रश्न सुटू शकतो. तोटीनं फवारे मारून गाडी धुण्याऐवजी ओल्या कपड्यानं पुसली तर त्या पाण्यानं एखाद्या कुटुंबाला पाणी मिळू शकतं. आता पुन्हा काहींना मी जरा जास्त लिहितोय, असं वाटू शकेल. जेथे पाणी आहे तेथे उगाच काटकसर कशाला? असेही प्रश्न फेकले जातील. पण तसं नाही. मराठवाड्याचे बीड, परभणी हे जिल्हे तर अगदी वाळवंटच झाल्यासारखी परिस्थिती आहे. पाणी कुठून आणायचे हा प्रश्न मुंबई-पुण्याच्या वाटचं काही पाणी द्यावंच लागेल. रेल्वे किंवा अन्य मिळेल त्या साधनाने आपल्या माणसांची तहाण भागवावीच लागेल. अर्थात सर्वात महत्वाचं म्हणजे सामान्यांनी पाण्याची उधळपट्टी थांबवतानाच प्रशासकीय यंत्रणेला पाणी गळतीही रोखावीच लागेल. एकट्या पुण्यात एक टीएमसी पाणी वाया जातं. मुंबईही गळतीत काही मागे नाही. अधिकारी असो वा सर्वसामान्य. आपण सर्वांनीच एकच लक्षात घेतलं पाहिजे. खाऊन माजा, टाकून नको!”
       

-   व्यवस्थापकीय संपादक,
-   मी मराठी न्यूज चॅनल
-   twitter @tulsidasbhoite
M - 9833794961




No comments:

Post a Comment