Thursday, August 20, 2015

महाराष्ट्रदूषण

दैनिक मी मराठी लाईव्ह  

लढा – 24





"गावाकडे कशी स्थिती आहे पाण्याची?" परमेश्वरला सहजंच विचारलं आणि तो कसानुकसा हसला. बीड जिल्ह्यातल्या  मोरफळी गावचा परमेश्वर, मी मराठीच्या टीमचा उत्साही सहकारी.  अंबेजोगाईजवळ धारोल तालुक्यात त्याचं गाव. सध्या मुंबईत असल्यानं पाणी भरपूर मिळतं. मात्र गावाकडचे आई बाबा आठवले की पाण्याची ही चैन परवडणारी नसल्याची जाणीव ठेऊन तो वागतो. पण ग्लासभर पाण्यातील घोटभर पिऊन उरलेले बेसिनमध्ये फेकण्याचा माज तो कधी दाखवताना मला दिसला नाही.  
त्याच्याच मोरफळीच्या रवी गडदेंशी बोलणं झालं. ग्रामीण तरूण. गावातील एक-एक वेदना शब्दातून व्यक्त करू लागला, “गावाला पाणीच नाही. तळ्यातलंच उरलं सुरलं देतात. तळ्यातील पाणी पंपानं थेट काढून देत असल्यनं त्यात अळ्याही येतात. माणूस उघड्या डोळ्यानं पिऊच शकत नाही. काही ठिकाणी बोअर आहे. पण पाणी पातळी खूपच खोलवर गेलीय. काही दिवासंनी पाणी मिळतं. पण वीज नसते. ७-८ तास येते तेवढीच. गुरांना चारा नाही. उसाच्या धारेनं गुरांची तोंड कापली जातात. मात्र दुसरं काही सापडतच नाही. करणार काय. बॅंक पीक कर्ज देत नाही. मागेच थांबवलं. ग्रामीण बॅंकेनं गाव दत्तक घेतलं आहे. मात्र वाऱ्यावर सोडलंय. महिना-दीड महिना झालं एकालाही पीक कर्ज दिलेलं नाही. जे चलाख आहेत, त्यांना मात्र मिळतं.
बीडनंतर लातुरच्या हनुमंत उगीलेंशी बोललो. त्यांचं तळणी गाव रेणापूर तालुक्यात आहे. भीषण स्थिती. मात्र भावनावश न होता सांगू लागले. पूर्वी टॅंकर येत होता. आता मात्र टॅंकर १५ दिवसांपासून एकाच जागी उभा. टॅंकरमध्ये पाणी आणायचे तरी कुठून. एका बोअरला पाणी आहे. मात्र बोअरला १०-१२ दिवसांनंतर ५-६ घागरी पाणी येतं. पिकं ९० टक्के गेलीत. वाळून गेलीत. खूप वाईट परिस्थिती आहे यावर्षी. गेल्यावर्षी वाईटच होतं. गेल्यावर्षी एका पावसाने बरं वाटलं. पाणी पातळी मात्र खालावलेलीच राहिली. आता तर खूपच वाईट स्थिती झालीय. मिळून तेथून पाणी आणावं लागतं. सायकल, मोटरसायकल ज्याला जमेल तसं जमेल तिथून पाणी आणतो. मात्र खूप तग धरता येईल असं काही नाही.
एक दिवस नळाला पाणी नाही आलं तर ठणाणा करणारे आपण, त्यामुळे हनुमंतांचा शांतपणा अस्वस्थ करणारा होता. शांतपणे ते ओढवलेली परिस्थिती सांगत होते. एवढी वाईट स्थिती खरंतर लोकांनी हाय खाल्ली असती. मात्र अस्मानी अवकृपा झालेली असतानाच सुलतानीही म्हणावी तशी साथ देत नाहीय. तरीही लोकं शांत आहेत. आपल्याला जमेल ते करत आहेत. हनुमंत अशांचंच प्रातिनिधीक रूप. पुढे सांगू लागले, जिल्हाधिकाऱ्यांनी देवासला टीम पाठवली होती. मीही टीममध्ये होतो. भैयू महाराजांच्या सुर्योद्य परिवाराच्यावतीनं खोदलेली २००-३०० तळी पाहून आलो. आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देऊ. आमच्या भागातही २००० शेततळी खोदायचं काम चालू करू. आता यावर्षी शेती नाही तर तळी खोदण्यासाठी राबू. देवासप्रमाणे आमच्या भागातही १२ महिने पाणी मिळेल.
     रवी, हनुमंत मराठवाड्यातल्याच नव्हे तर आपल्या दुष्काळानं होरपळलेल्या ग्रामीण भागाचे खरे चेहरे आहेत. ऑगस्टमध्येच हजारो गावांमध्ये पाणी मिळत नाही. जायकवाडीसारख्या मोठ्या धरणांमध्येही पाणी नाही तर चिखल दिसतो. फक्त चिखल. विहिरींची, तलावांची अवस्था फार काही वेगळी नाही. काही ठिकाणी पाणी आहे. थोडंसं चिखलं मिसळलेलं. मात्र त्यात अळ्या आहेत. तरीही प्यावं लागतं. काही ठिकाणी तर चिखलही सुकून गेलाय.
पाणी कुठेच नाही. असलंच तर फक्त ते तहानलेल्या आपल्या माणसांच्या डोळ्यात. मात्र ते गळा काढत नाहीत. तसंच आपत्ती कोसळल्यानंतर आकांड-तांडव नाही करायचा. शांत राहायचे. परिस्थिती स्वीकारायची. मात्र हतबल नाही व्हायचं. परिस्थिती बदलण्यासाठी करता येईल तसा सकारात्मक संघर्ष करायचा. अशा वेगळ्याच भावनेनं ते कामाला लागलेले दिसतात.
एकीकडं आपला महाराष्ट्र, राज्यातील आपली माणसं दुष्काळानं होरपळून निघालेयत. दुसरीकडं गेले काही दिवस एक वेगळंच आकांडतांडव चाललं ते मात्र महाराष्ट्रभूषण पुरस्कारावरून. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे महागाईचा वणवाही आता भडकू लागलाय. मात्र सामान्य त्या वणव्यात होरपळत असताना राजकारणी मात्र भावनिक मुद्द्यांच्या शिमग्यात दंग झालेयत. महाराष्ट्रभूषण पेक्षाही सामान्यांना भोवणा-या महागाई, दुष्काळ या समस्यांकडे लक्ष द्यावे असं काही कुणाला वाटले नाही. मोर्चे काढून हे प्रश्न सुटणार नसतात. त्यासाठी सकारात्मक, रचनात्मक प्रयत्नांची गरज आहे. तसे होताना दिसत नाही.
राज्यावर कोसळलेली आपत्ती ही महाआपत्ती आहे. गेल्यावर्षी दुष्काळ सोसलेल्या जिल्ह्यांकडे यावर्षीही पावसाने पाठ फिरवली आहे. ऑगस्टमध्येच पाणी नाही. पुढच्या पावसापर्यंतचे दहा महिने कसे काढायचे? हा प्रश्न आ वासून उभा ठाकलाय. गरज आहे ती एकत्रित प्रयत्नांची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाला तोंड देण्यासाठी सर्वपक्षीय तसंच राजकारणाबाहेरच्या तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती तयार केली पाहिजे असे वाटते. शरद पवार, नितीन गडकरी, दिवाकर रावते यांच्यासारखे अनुभवी राजकारणी तसेच राजेंद्र सिंह, सुरेश खानापूर कर, प्रफुल्ल कदम यांच्यासारख्या पाण्यासाठी काम करणाऱ्यांनाही सोबत घेता येईल.
तसं झालं पाहिजे. पण होत नाही. बाबासाहेब पुरदरेंना महाराष्ट्रभूषण देण्या न देण्यासाठी जो दुराग्रह झाला. त्यासाठी जे आकांडतांडव झाले. करण्याचे इशारे दिले गेले. ते सध्याच्या परिस्थितीत योग्य होते असे या नेत्यांचे समर्थकही म्हणू शकतील असं वाटत नाही. आश्चर्य खरंतर बाबासाहेबांचेही वाटले. रयत दुष्काळात होरपळत असताना पुरस्काराचे सोहळे करणे हे शिवाजीमहाराजांना चाललं असतं का?
असो, एकूणच आपले राजकारणी खरोखरच जाणतेपणाने वागतील आणि तुम्हा-आम्हा सामान्यांच्या खऱ्या समस्या जाणतील अशी अपेक्षा आहे. तसं झालं तरच दुष्काळाच्या महाआपत्तीत आपण तहानेनं व्याकूळ होऊन मरण्यापासून आपल्या माणसांना वाचवू शकू. तसं झालंच पाहिजे. एका जरी माणसाला पाण्याविना जीव गमवावा लागला तरी ते महाराष्ट्रासाठी, आपल्या सर्वांसाठीच महाराष्ट्रदूषण असेल. प्रश्न एवढाच की खरोखरच आपले नेते आकांडतांडव करण्याऐवजी जीव वाचवणारं महाराष्ट्रभूषण ठरणारी जाण दाखवतील का?

#तुळशीदास भोईटे
    व्यवस्थापकीय संपादक,
    मी मराठी न्यूज चॅनल
    twitter @tulsidasbhoite
    M - 9833794961




No comments:

Post a Comment