Thursday, August 27, 2015

खाऊन माजा, टाकून नको!

अरे खाऊन माजा, टाकून माजू नका”,  लहानपणी आईचा हा टोला ठरलेला असायचा. भावंडापैकी कुणीही काहीही ताटात सोडलं तर ती हमखास बजावायची. तेव्हा जास्त काही कळायचं नाही. एवढंच समजायचं वाढलेल्या अन्नापैकी काही सोडलेलं आईला आवडत नाही. नंतर कळलं आई तसं का बोलते. आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आईच्या त्या बोलण्याचं महत्व चांगलंच पटतंय.



कॅबिनमधील टीव्हीच्या पडद्यावर बातम्या सुरू असतात. मंगळवारी बीडच्या एका शेतकऱ्यांची बातमी बीग टेक्स्टमध्ये चालू झाली आणि हातातला घास तसाच राहिला. मनच होईना, पुढचा सोडा पण तोही घास तोंडाकडे नेण्याचं. त्यात पुन्हा आईचे संस्कार करणारे टोले आठवले. अरे खाऊन माजा, टाकून माजू नका. हे सारं थैमान मनात सुरू होण्यास कारण ठरलेली ती बातमीही तशीच होती.


दुष्काळी परिस्थितीला वैतागून शेतक-याची आत्महत्या
शिरुर कासार तालुक्यातील खोल्याचीवाडी येथील घटना
दादासाहेब खोले या शेतक-याने केली आत्महत्या
जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसा नसल्याने केली आत्महत्या

      बीडचे पत्रकार अविशांत कुमकर यांनी अगदी पोटतिडकीनं विषय मांडला. बातमी डोळ्यासमोरून गेली. पण अगदी डोक्यातच घुसली. मनाला लागली. दुसऱ्याच दिवशी बीडच्याच आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मग मात्र राहवलं नाही. अविशांतला फोन केला. अविशांत उत्साही तरूण पत्रकार. बीडच्या गावागावात, वस्त्यांवर फिरणारा. नेमक्या परिस्थितीची माहिती ठेवणारा.
बीड तसा कमी पावसाचाच जिल्हा. मात्र गेली दोन वर्ष पावसानं जरा जास्तच पाठ फिरवली. अगदी ढुंकूनही पाहिलं नाही अशीही तिथं गावच्या गावं आहेत. पाटोदा, आष्टी, शिरूर कासार, गेवराई, टाकळशी, शेकापूर, बीड, सांगवी...तालुक्यांमागून तालुके कोरडेठाण पडलेत.
तसे दीडशे टॅंकर फिरतात. मात्र तरीही पाणी टंचाई कायमच. कमी होणार कशी. हंडाभर पाण्याची तहाण चमच्याभर पाण्यानं कशी भागणार? त्यात पुन्हा पाणी आणायलाच जलस्त्रोत उरले नाहीत तर पाणी आणणार तरी कुठून? जेथे पाणी आहे तेथून ते भरायला टॅंकर न्यावा तर वीजच नाही. वीजपुरवठा नसल्यानं टॅंकर भरता येत नाही. त्यामुळे पाणी पुरवता येत नाही. ग्रामीण भागाच्या पाचवीलाच पुजलेला वीजेचा दुष्काळ आताच्या दुष्काळाची दाहकता अधिकच वाढवतोय.
बीडच्या ज्या बातमीमुळे डोक्यात हे सारं चक्र सुरू झालं ती अशीच. दुष्काळी परिस्थितीला वैतागून दादासाहेब खोले यांनी जीवन संपवले. काय कारण होतं? दुष्काळ आहेच. पण शेतकरी लढत असतो. रडत नसतो. तरीही दादासाहेबांनी स्वत:ला संपवलं कारण त्यांच्या पोटच्या लेकरांसारखं असणाऱ्या जनावरांना द्यायला त्यांच्याकडे चाराच नव्हता. चारा असणार तरी कसा? गेली दोन वर्ष पाऊस दगा देत आहे. पडतच नाही. पडला तरी अवकाळी पडतो. त्यामुळे चारा आणायचा कुठून? ऊसाच्या पातींचा द्यायचा म्हटलं तरी तो आता आहेच नाही. कुठून मिळवला तरी त्याच्या धारेनं जनावरांची तोंड कापली जातात. पुन्हा जनावरं काही केल्या तोंड लावत नाहीत. त्यामुळे दादासाहेबांच्या जनावरांनाही काही देता येत नव्हतं. त्या हतबलतेतूनच त्यांनी जीवन संपवलं असावं.
 पोटच्या लेकरासारखं सांभाळलेल्या जनावरांना मातीमोल भावानं विकावे लागत आहेत. बीडमध्ये किमान सहा ते सात लाख लिटर दूध संकलन घटलं असावं. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ लागलंय. मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सूरू झालंय. कदाचित गेल्या काही दशकांमधलं सर्वात मोठं स्थलांतर सुरू झालंय.
तेवढ्यात समोरचा फोन वाजला. मुंबईत पाणीटंचाई जाहीर होऊ शकते. गेल्यावर्षापेक्षा यावेळी खूप कमी पाऊस झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये चार दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. त्यामुळे स्वाभाविकच मुंबईत पाणी कपात केल्याशिवाय पर्याय नव्हता. तेवढ्यात पुण्याची बातमी आली. पुण्यात तरणतलाव, गाडी धुणे, बांधकाम यासाठी पाणीवापरावर बंदी आली. आता शक्यता आहे, काहींचा नाराजीचा सूर उमटेल. कमी पाण्यात कसं भागवायचं? पोहणं बंद करायचं? गाड्या नाही धुवायच्या? लॉन वाळू द्यायचा? एवढं पाणी आहे ना तलावांमध्ये. उगाच कशाला पाणीकपात करता. पाण्याच्या वापरावर बंदी लादता.
ज्यांच्या डोक्यात असे विचार येतील त्यांनी फक्त एवढंच लक्षात घ्यावं की आपण शॉवर घेतो तेव्हा त्यात एका बादलीत होणारी आंघोळ ही चार-सहा बादल्यांवर सहज जाते. म्हणजे एका माणसानं शॉवर नाही घेतला, तर गावच्या एका कुटुंबाची पाण्याची गरज भागू शकते. तसंच एका तरणतलावानं एका छोट्या दुष्काळी गावचा पाणी प्रश्न सुटू शकतो. तोटीनं फवारे मारून गाडी धुण्याऐवजी ओल्या कपड्यानं पुसली तर त्या पाण्यानं एखाद्या कुटुंबाला पाणी मिळू शकतं. आता पुन्हा काहींना मी जरा जास्त लिहितोय, असं वाटू शकेल. जेथे पाणी आहे तेथे उगाच काटकसर कशाला? असेही प्रश्न फेकले जातील. पण तसं नाही. मराठवाड्याचे बीड, परभणी हे जिल्हे तर अगदी वाळवंटच झाल्यासारखी परिस्थिती आहे. पाणी कुठून आणायचे हा प्रश्न मुंबई-पुण्याच्या वाटचं काही पाणी द्यावंच लागेल. रेल्वे किंवा अन्य मिळेल त्या साधनाने आपल्या माणसांची तहाण भागवावीच लागेल. अर्थात सर्वात महत्वाचं म्हणजे सामान्यांनी पाण्याची उधळपट्टी थांबवतानाच प्रशासकीय यंत्रणेला पाणी गळतीही रोखावीच लागेल. एकट्या पुण्यात एक टीएमसी पाणी वाया जातं. मुंबईही गळतीत काही मागे नाही. अधिकारी असो वा सर्वसामान्य. आपण सर्वांनीच एकच लक्षात घेतलं पाहिजे. खाऊन माजा, टाकून नको!”
       

-   व्यवस्थापकीय संपादक,
-   मी मराठी न्यूज चॅनल
-   twitter @tulsidasbhoite
M - 9833794961




Thursday, August 20, 2015

महाराष्ट्रदूषण

दैनिक मी मराठी लाईव्ह  

लढा – 24





"गावाकडे कशी स्थिती आहे पाण्याची?" परमेश्वरला सहजंच विचारलं आणि तो कसानुकसा हसला. बीड जिल्ह्यातल्या  मोरफळी गावचा परमेश्वर, मी मराठीच्या टीमचा उत्साही सहकारी.  अंबेजोगाईजवळ धारोल तालुक्यात त्याचं गाव. सध्या मुंबईत असल्यानं पाणी भरपूर मिळतं. मात्र गावाकडचे आई बाबा आठवले की पाण्याची ही चैन परवडणारी नसल्याची जाणीव ठेऊन तो वागतो. पण ग्लासभर पाण्यातील घोटभर पिऊन उरलेले बेसिनमध्ये फेकण्याचा माज तो कधी दाखवताना मला दिसला नाही.  
त्याच्याच मोरफळीच्या रवी गडदेंशी बोलणं झालं. ग्रामीण तरूण. गावातील एक-एक वेदना शब्दातून व्यक्त करू लागला, “गावाला पाणीच नाही. तळ्यातलंच उरलं सुरलं देतात. तळ्यातील पाणी पंपानं थेट काढून देत असल्यनं त्यात अळ्याही येतात. माणूस उघड्या डोळ्यानं पिऊच शकत नाही. काही ठिकाणी बोअर आहे. पण पाणी पातळी खूपच खोलवर गेलीय. काही दिवासंनी पाणी मिळतं. पण वीज नसते. ७-८ तास येते तेवढीच. गुरांना चारा नाही. उसाच्या धारेनं गुरांची तोंड कापली जातात. मात्र दुसरं काही सापडतच नाही. करणार काय. बॅंक पीक कर्ज देत नाही. मागेच थांबवलं. ग्रामीण बॅंकेनं गाव दत्तक घेतलं आहे. मात्र वाऱ्यावर सोडलंय. महिना-दीड महिना झालं एकालाही पीक कर्ज दिलेलं नाही. जे चलाख आहेत, त्यांना मात्र मिळतं.
बीडनंतर लातुरच्या हनुमंत उगीलेंशी बोललो. त्यांचं तळणी गाव रेणापूर तालुक्यात आहे. भीषण स्थिती. मात्र भावनावश न होता सांगू लागले. पूर्वी टॅंकर येत होता. आता मात्र टॅंकर १५ दिवसांपासून एकाच जागी उभा. टॅंकरमध्ये पाणी आणायचे तरी कुठून. एका बोअरला पाणी आहे. मात्र बोअरला १०-१२ दिवसांनंतर ५-६ घागरी पाणी येतं. पिकं ९० टक्के गेलीत. वाळून गेलीत. खूप वाईट परिस्थिती आहे यावर्षी. गेल्यावर्षी वाईटच होतं. गेल्यावर्षी एका पावसाने बरं वाटलं. पाणी पातळी मात्र खालावलेलीच राहिली. आता तर खूपच वाईट स्थिती झालीय. मिळून तेथून पाणी आणावं लागतं. सायकल, मोटरसायकल ज्याला जमेल तसं जमेल तिथून पाणी आणतो. मात्र खूप तग धरता येईल असं काही नाही.
एक दिवस नळाला पाणी नाही आलं तर ठणाणा करणारे आपण, त्यामुळे हनुमंतांचा शांतपणा अस्वस्थ करणारा होता. शांतपणे ते ओढवलेली परिस्थिती सांगत होते. एवढी वाईट स्थिती खरंतर लोकांनी हाय खाल्ली असती. मात्र अस्मानी अवकृपा झालेली असतानाच सुलतानीही म्हणावी तशी साथ देत नाहीय. तरीही लोकं शांत आहेत. आपल्याला जमेल ते करत आहेत. हनुमंत अशांचंच प्रातिनिधीक रूप. पुढे सांगू लागले, जिल्हाधिकाऱ्यांनी देवासला टीम पाठवली होती. मीही टीममध्ये होतो. भैयू महाराजांच्या सुर्योद्य परिवाराच्यावतीनं खोदलेली २००-३०० तळी पाहून आलो. आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देऊ. आमच्या भागातही २००० शेततळी खोदायचं काम चालू करू. आता यावर्षी शेती नाही तर तळी खोदण्यासाठी राबू. देवासप्रमाणे आमच्या भागातही १२ महिने पाणी मिळेल.
     रवी, हनुमंत मराठवाड्यातल्याच नव्हे तर आपल्या दुष्काळानं होरपळलेल्या ग्रामीण भागाचे खरे चेहरे आहेत. ऑगस्टमध्येच हजारो गावांमध्ये पाणी मिळत नाही. जायकवाडीसारख्या मोठ्या धरणांमध्येही पाणी नाही तर चिखल दिसतो. फक्त चिखल. विहिरींची, तलावांची अवस्था फार काही वेगळी नाही. काही ठिकाणी पाणी आहे. थोडंसं चिखलं मिसळलेलं. मात्र त्यात अळ्या आहेत. तरीही प्यावं लागतं. काही ठिकाणी तर चिखलही सुकून गेलाय.
पाणी कुठेच नाही. असलंच तर फक्त ते तहानलेल्या आपल्या माणसांच्या डोळ्यात. मात्र ते गळा काढत नाहीत. तसंच आपत्ती कोसळल्यानंतर आकांड-तांडव नाही करायचा. शांत राहायचे. परिस्थिती स्वीकारायची. मात्र हतबल नाही व्हायचं. परिस्थिती बदलण्यासाठी करता येईल तसा सकारात्मक संघर्ष करायचा. अशा वेगळ्याच भावनेनं ते कामाला लागलेले दिसतात.
एकीकडं आपला महाराष्ट्र, राज्यातील आपली माणसं दुष्काळानं होरपळून निघालेयत. दुसरीकडं गेले काही दिवस एक वेगळंच आकांडतांडव चाललं ते मात्र महाराष्ट्रभूषण पुरस्कारावरून. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे महागाईचा वणवाही आता भडकू लागलाय. मात्र सामान्य त्या वणव्यात होरपळत असताना राजकारणी मात्र भावनिक मुद्द्यांच्या शिमग्यात दंग झालेयत. महाराष्ट्रभूषण पेक्षाही सामान्यांना भोवणा-या महागाई, दुष्काळ या समस्यांकडे लक्ष द्यावे असं काही कुणाला वाटले नाही. मोर्चे काढून हे प्रश्न सुटणार नसतात. त्यासाठी सकारात्मक, रचनात्मक प्रयत्नांची गरज आहे. तसे होताना दिसत नाही.
राज्यावर कोसळलेली आपत्ती ही महाआपत्ती आहे. गेल्यावर्षी दुष्काळ सोसलेल्या जिल्ह्यांकडे यावर्षीही पावसाने पाठ फिरवली आहे. ऑगस्टमध्येच पाणी नाही. पुढच्या पावसापर्यंतचे दहा महिने कसे काढायचे? हा प्रश्न आ वासून उभा ठाकलाय. गरज आहे ती एकत्रित प्रयत्नांची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाला तोंड देण्यासाठी सर्वपक्षीय तसंच राजकारणाबाहेरच्या तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती तयार केली पाहिजे असे वाटते. शरद पवार, नितीन गडकरी, दिवाकर रावते यांच्यासारखे अनुभवी राजकारणी तसेच राजेंद्र सिंह, सुरेश खानापूर कर, प्रफुल्ल कदम यांच्यासारख्या पाण्यासाठी काम करणाऱ्यांनाही सोबत घेता येईल.
तसं झालं पाहिजे. पण होत नाही. बाबासाहेब पुरदरेंना महाराष्ट्रभूषण देण्या न देण्यासाठी जो दुराग्रह झाला. त्यासाठी जे आकांडतांडव झाले. करण्याचे इशारे दिले गेले. ते सध्याच्या परिस्थितीत योग्य होते असे या नेत्यांचे समर्थकही म्हणू शकतील असं वाटत नाही. आश्चर्य खरंतर बाबासाहेबांचेही वाटले. रयत दुष्काळात होरपळत असताना पुरस्काराचे सोहळे करणे हे शिवाजीमहाराजांना चाललं असतं का?
असो, एकूणच आपले राजकारणी खरोखरच जाणतेपणाने वागतील आणि तुम्हा-आम्हा सामान्यांच्या खऱ्या समस्या जाणतील अशी अपेक्षा आहे. तसं झालं तरच दुष्काळाच्या महाआपत्तीत आपण तहानेनं व्याकूळ होऊन मरण्यापासून आपल्या माणसांना वाचवू शकू. तसं झालंच पाहिजे. एका जरी माणसाला पाण्याविना जीव गमवावा लागला तरी ते महाराष्ट्रासाठी, आपल्या सर्वांसाठीच महाराष्ट्रदूषण असेल. प्रश्न एवढाच की खरोखरच आपले नेते आकांडतांडव करण्याऐवजी जीव वाचवणारं महाराष्ट्रभूषण ठरणारी जाण दाखवतील का?

#तुळशीदास भोईटे
    व्यवस्थापकीय संपादक,
    मी मराठी न्यूज चॅनल
    twitter @tulsidasbhoite
    M - 9833794961