अच्छे दिन पाहिजेतच...
सध्या रेल्वेच्या अतिरेकी भाडेवाढीमुळे वातावरण जास्तच तापलंय. महागाई वाढली तर काय झालं, ती अपरिहार्य आहे. सहन करा. असा सूर उमटतोय. महागाईविरोधात बोलणारे जणू काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधकच अशी टोकाची भूमिका मांडली जातेय. मोदींना का निवडून दिले त्याबद्दल त्यांना मते देणाऱ्यांनाच मते देण्यामागची कारणे सुनावली जात आहे.
मला वाटते, हे जास्त होतंय. थोडा शांतपणे विचार करा.
मान्य आहे. सुशासनासाठीच निवडून दिले. फक्त आता त्या सामान्यांचा विचार करा. ज्यांच्यासाठी सुशासन आणायचे आहे. उदाहरणादाखल कमी उत्पन्न असलेल्या एका मुबईकर कुटुंबाचा विचार करा. कसंबसं जगतात ते. अगदी 3 माणसांचा प्रवास खर्च दुपटीने वाढला तर त्यांना घरातील दुधासारख्या आवश्यक बाबींवरील खर्च कमीच करावा लागेल. त्यात पुन्हा माल वाहतूक दर वाढीमुळे इतर वस्तुंच्याही किंमतीत वाढ होणारच. तो बोजा वेगळाच. मोदींच्या व्हिजन २०२२ साठी कशी बलशाली नवी पिढी मिळणार?
भाव वाढीचा निर्णय कॉंग्रेसचाच! हे मान्य आहे!! तरी तो जसाचा तसा राबवण्याऐवजी उत्पन्न वाढीचे काही कल्पक मार्ग वापरता आले असते ना.
१) वेगळ्या मार्गाने जाहिराती, त्यातून उत्पन्न
२) रेल्वे मार्गातून विद्युत वाहिन्यांचा, सिग्नल केबलचा वापर करून ऑप्टिकल फायबरने इंटरनेट सेवेचा खाजगी कंपन्यांना अधिकार
३) ज्यादा जमिनींचा, अतिक्रमण झालेल्या जमिनींचा न विकता अन्य मार्गे उत्पन्नासाठी वापर
४) रेल्वे स्थानक परिसरात व्यावसायिक केंद्र बांधून ते खाजगीरीत्या भाड्याने वापरू देणे
असे एक ना अनेक मार्ग होते ना. प्रचारातून मोकळ्या झालेल्या टीमच्या कल्पकतेचा यासाठी वापर करता आला असता. मात्र तसे न करता कॉंग्रेसच्या चुकीचा बोजा सर्वसामान्यांच्या डोक्यावर लादण्यात आलाय. त्यामुळे महागाईचे अच्छे दिन आलेयत. सर्वसामान्यांचे नाही! मोदी काम करत आहेत. इतरांनाही करायला लावत आहेत. त्याबद्दल शंका नाही. फक्त या सा-या प्रयत्नांनंतर येणारे अच्छे दिन पाहायला सामान्य माणसांनी जगलं पाहिजे एवढी रास्त अपेक्षा ठेवली तर कुणी वावगे मानू नये.
जाता जाता सोबतच्या छायाचित्रांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशावर शांत डोक्याने नजर टाकली तर माझ्या सारख्या सर्वसामान्यांच्या भावना कळू शकतील.
-तुळशीदास भोईटे ०९८३३७९४९६१
